
प्राणघातक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात जगभरातील भारतीय समुदायांनी आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि कॅनडासह अनेक देशांमध्ये निदर्शने केली.
हाती आलेल्या वृत्तांनुसार, कॅनडा, डेन्मार्क, इंग्लंड, फ्रान्स, फिनलंड, जर्मनी, स्पेन आणि अमेरिकेतील शहरांमध्ये ही निदर्शने करण्यात आली.
निदर्शनांदरम्यान, निदर्शक हातात फलक घेऊन, पाकिस्तानविरोधी घोषणा देताना आणि भारतीय झेंडे फडकावताना दिसले.
पॅरिसमधील एका आंदोलकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलेः “पाकिस्तानने यापूर्वीही अनेक हल्ले केले आहेत, आम्ही पुलवामा, 26/11 (मुंबई) आणि आता पहलगाम दहशतवादी हल्ला पाहिला आहे. आम्ही कोणत्याही धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही. आम्हाला फक्त पाकिस्तानला एक संदेश द्यायचा आहे.”
लंडनमधील निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय समुदायाच्या एका सदस्याने भारतीय वृत्तसंस्थेला सांगितलेः “दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आमचा पाठिंबा आणि एकता दाखवण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला आशा आहे की भारत सरकार पाकिस्तानला त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देईल.”
पहलगामचा हल्ला
22 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर जेव्हा दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर केलेल्या सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात 26 पुरुषांना, मुख्यतः हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले.
यातून बचावलेल्यांनी सांगितले की बंदूकधाऱ्यांनी काही पर्यटकांना त्यांच्या धर्माविषयी विचारले आणि त्यांनी इस्लामी श्लोकांचे पठण करण्याची मागणी केली. जे यात अयशस्वी झाले किंवा ज्यांनी याला नकार दिला, त्यांच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की किमान पाच दहशतवादी लहान गटांमध्ये विभागले गेले आणि त्यांनी पठारावरील तीन भागांवर हल्ला केला.
दहा मिनिटांपेक्षा कमी काळ चाललेल्या या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक पोनी ऑपरेटरसह 26 जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये गुप्तचर विभागाचे (आयबी) एक अधिकारी, भारतीय नौदलाचा एक लेफ्टनंट आणि भारतीय हवाई दलाचा (आयएएफ) एक कॉर्पोरल यांचा समावेश आहे – जे त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवायला तिथे गेले होते.
या दहशतवादी घटनेत पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी गट सहभागी असल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत.
हाशिम मुसा ऊर्फ सुलेमान आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई अशी त्यांची नावे असून ते पाकिस्तानचे रहिवासी आहेत.
अनंतनाग येथील आदिल हुसेन थोकर असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे.
या हल्ल्यामुळे अण्वस्त्रधारी शेजारी देश भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत.
भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
भारताचे सुरुवातीचे उपाय राजनैतिक पण निर्णायक राहिले आहेत. 1960 चा सिंधू जल करार स्थगित करणे, अटारी येथील सीमा तातडीने बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठीची सार्क व्हिसा सूट योजना ((SVES) रद्द करणे, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांना देश सोडण्यास सांगणे, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या लष्करी सल्लागारांना मायदेशी बोलावणे, 1 मेपासून दोन्ही उच्चायुक्तालयांची क्षमता सध्याच्या 55 कर्मचाऱ्यांवरून 30 कर्मचाऱ्यांपर्यंत घटविणे असे काही निर्णय घेतले आहेत.
पर्यटनाच्या हंगामात या लोकप्रिय पर्यटनस्थळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल रोजी म्हटले होते की, निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्यासाठी दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांना अकल्पनीय किंमत मोजावी लागणार आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)