
जम्मू-काश्मीरमधील Pahalgam येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव दिवसागणीक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रविवारी सांगितले की, “वॉशिंग्टन भारत आणि पाकिस्तान दोघांच्याही संपर्कात आहे आणि त्यांना याबाबत ‘सामंजस्याने तोडगा’ काढण्याचे आवाहन केले आहे.”
पहलगाम येथील हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला सार्वजनिकरित्यापाठिंबा दिला आहे, पण पाकिस्तानवर कोणतीही टीका केलेली नाही.
भारताने 22 एप्रिल रोजी, जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवले आहे, ज्यात दोन डझनहून अधिक लोक ठार झाले. पाकिस्तानने मात्र या हल्ल्याची जबाबदारी नाकारली असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
“ही परिस्थिती अजूनच चिघळत आहे आणि आम्ही सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान सरकारशी अनेक स्तरांवर संपर्कात आहोत,” असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने Reuters ला एका ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात सांगितले.
“संयुक्त राष्ट्र, दोन्ही पक्षांनी जबाबदारीने आणि सामंजस्याने संघर्ष निवारणासाठी प्रयत्न करण्याला, प्रोत्साहन देते,” असे प्रवक्त्याने पुढे नमूद केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने असेही सांगितले की, “वॉशिंग्टन भारताच्या पाठीशी उभा आहे आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.” हे मत व्यक्त करताना राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी पूर्वी व्यक्त केलेल्या भारताविषयीच्या मतांची पुनरावृत्ती केली.
भारत अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा भागीदार ठरत आहे, कारण वॉशिंग्टनला आशियामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करायचा आहे. दुसरीकडे, पाकिस्तान अजूनही अमेरिकेसाठी एक सहयोगी आहे, जरी 2021 मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकन फौजा माघारी घेतल्यानंतर त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
Foreign Policy मासिकाचे विश्लेषक आणि लेखक मायकेल कुगेलमन यांनी सांगितले की, “आता भारत अमेरिकेसाठी पाकिस्तानपेक्षा अधिक जवळचा भागीदार आहे.”
“यामुळे इस्लामाबादची चिंता वाढली आहे की, जर भारताने लष्करी कारवाई केली तर अमेरिका भारताच्या दहशतवादविरोधी उद्दिष्टांना पाठिंबा दर्शवेल आणि त्याच्या मार्गात येणार नाही,” असे त्यांनी Reuters ला सांगितले.
कुगेलमन यांनी असेही म्हटले की, “रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्राइल-गाझा संघर्षामध्ये वॉशिंग्टन सध्या गुंतलेले असल्यामुळे, ट्रम्प प्रशासन ‘जगभरात अनेक आघाड्यांवर ताणले गेले आहे’ आणि त्यामुळे कदाचित ते भारत आणि पाकिस्तानला सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या नशिबावर सोडेल.”
अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत आणि Hudson Institute या थिंक टँकचे वरिष्ठ संशोधक, हुसैन हक्कानी यांनीही सांगितले की, “सध्या अमेरिकेला या परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यात फारसा रस वाटत नाही.”
“सीमेपलीकडून होणाऱ्या किंवा समर्थित दहशतवादाबद्दल भारताची तक्रार जुनी आहे. पाकिस्तानचा असा विश्वास आहे की, भारत त्याला तोडू इच्छितो. दर काही वर्षांनी दोघेही एकमेकांवर कुरघोडी करत असतात. अशावेळी परिस्थिती शांत करण्यात अमेरिकेला रस नाही,” असेही हक्कानी म्हणाले.
तणाव वाढतो आहे
मुस्लिम बहुल काश्मीरवर, हिंदू बहुल भारत आणि इस्लामिक पाकिस्तान या दोन्ही देशांनी पूर्ण हक्क सांगितला असला, तरी या दोन्ही देशांनी काश्मीरच्या काही भागांवरच राज्य केले आहे आणि यापूर्वी हिमालयीन प्रदेशावरुन अनेकदा युद्धे लढली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हल्लेखोरांचा “पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठलाग करण्याचे” वचन दिले आहे आणि काश्मीर हल्ल्याची योजना आखणाऱ्या आणि तो घडवून आणणाऱ्यांना “त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा होईल” असेही म्हटले आहे. भारतीय राजकारणी आणि इतरांकडूनही पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाईचे आवाहन वाढले आहे. त्यामुळे साहाजिकच तणावही वाढतो आहे.
हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांनी, एकमेकांवर विविध निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले आकाशमार्ग बंद केले, तर भारताने 1960 मधील इंडस वॉटर ट्रीटी — जी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवरील जलवाटप नियंत्रित करते, ती निलंबित केली आहे.
दोघांनीही चार वर्षांच्या शांततेनंतर, पुन्हा एकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LoC) गोळीबार केला आहे.
काश्मीर रेसिस्टन्स या अल्पज्ञात दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे की, काश्मीर रेसिस्टन्स — ज्याला द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) म्हणूनही ओळखले जाते, ते पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांप्रमाणे लष्कर-ए-तैबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांचेच एक शॅडो रूप आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळातील परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी- नेड प्राइस यांनी सांगितले की, “ट्रम्प प्रशासन या मुद्द्याकडे आवश्यक तेवढे गांभीर्याने पाहत असले तरी, ते भारताला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देईल, असा समज निर्माण झाल्यास तणाव आणखी वाढू शकतो.”
“ट्रम्प प्रशासनाने अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी दृढ करण्याची आपली इच्छा स्पष्ट केली असून, हे उद्दिष्ट कोणत्याही किंमतीवर साध्य करायला ते तयार आहेत. जर भारताला वाटले की, ट्रम्प प्रशासन कोणत्याही परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहील, तर आपण भारत-पाक या दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधला तणाव अधिक वाढू शकतो आणि हिंसाचाराच्या दिशेने वाटचाल करू शकतो,” असे प्राइस म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)