पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनल्सवर भारतात बंदी, बीबीसीलाही इशारा

0

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या  पार्श्वभूमीवर प्रक्षोभक आणि जातीयदृष्ट्या संवेदनशील मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारताने 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स बंद केली आहेत.

भारत सरकारने सोमवारी डॉन, एआरवाय न्यूज, जिओ न्यूजसह आणि पाकिस्तानी पत्रकार इर्शाद भट्टी, अस्मा शिराझी, उमर चिमा आणि मुनीब फारूक यांच्या यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली.

वृत्तांनुसार, ही यूट्यूब चॅनल्स भारताशी संबंधित खोटी माहिती आणि प्रक्षोभक आशय पसरवत होती.

यूट्यूबवर या वाहिन्यांना भेट दिल्यावर, वापरकर्त्यांना एक सूचना दिसत आहे ज्यात म्हटले आहे, “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे यावरील आशय सध्या या देशात दिसणार नाही. अधिक माहितीसाठी, कृपया गुगल पारदर्शकता अहवालाला भेट द्या.”

बीबीसीलाही समज

बीबीसी इंडियाने आपल्या एका वृत्तात पहलगाम दहशतवाद्यांना “militants” म्हणून संबोधल्यानंतर, भारत सरकारने, परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) माध्यमातून, तीव्र आक्षेप नोंदवण्यासाठी बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांच्याशी संपर्क साधला.

याशिवाय हाती आलेल्या वृत्तांनुसार, अमेरिकन वृत्त संस्था असोसिएटेड प्रेस (एपी) आणि यूके स्थित रॉयटर्सकडेही अशाच प्रकारचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

एमईएने म्हटले आहे की  प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर मंत्रालयाचे बारीक लक्ष ठेवणे सुरूच राहिलं. परिस्थितीचे गांभीर्य चुकीच्या पद्धतीने दाखवणे किंवा त्यात तथ्यात्मक त्रुटी आहेत असे त्यांना वाटत असलेल्या कोणत्याही वृत्ताचा लगेच समाचार घेतला जाईल.

याशिवाय, अनेक पाकिस्तानी वेबसाइटस् युद्धाच्या तयारीसाठी देणग्या गोळा केल्याचा खोटा दावा करून भारतीयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय गृह मंत्रालयाने (एमएचए) भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय. 4. सी.) मदतीने गेल्या चार दिवसांत अशा अनेक यूआरएल ब्लॉक केल्या आहेत.

पहलगामचा हल्ला

22 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर जेव्हा दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर केलेल्या सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात 26 पुरुषांना, मुख्यतः हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले.

यातून बचावलेल्यांनी सांगितले की बंदूकधाऱ्यांनी काही पर्यटकांना त्यांच्या धर्माविषयी विचारले आणि त्यांनी इस्लामी श्लोकांचे पठण करण्याची मागणी केली. जे यात अयशस्वी झाले किंवा ज्यांनी याला नकार दिला, त्यांच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की किमान पाच दहशतवादी लहान गटांमध्ये विभागले गेले आणि त्यांनी पठारावरील तीन भागांवर हल्ला केला.

दहा मिनिटांपेक्षा कमी काळ चाललेल्या या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक पोनी ऑपरेटरसह 26 जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये गुप्तचर विभागाचे (आयबी) एक अधिकारी, भारतीय नौदलाचा एक लेफ्टनंट आणि भारतीय हवाई दलाचा (आयएएफ) एक कॉर्पोरल यांचा समावेश आहे – जे त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवायला तिथे गेले होते.

या दहशतवादी घटनेत पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी गट सहभागी असल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. हाशिम मुसा ऊर्फ सुलेमान आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई अशी त्यांची नावे असून ते पाकिस्तानचे रहिवासी आहेत.

अनंतनाग येथील आदिल हुसेन थोकर असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे.

या हल्ल्यामुळे अण्वस्त्रधारी शेजारी देश भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत.

भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

भारताचे सुरुवातीचे उपाय राजनैतिक पण निर्णायक राहिले आहेत. 1960 चा सिंधू जल करार स्थगित करणे, अटारी येथील सीमा तातडीने बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठीची सार्क व्हिसा सूट योजना ((SVES) रद्द करणे, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांना  देश सोडण्यास सांगणे, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या लष्करी सल्लागारांना मायदेशी बोलावणे, 1 मेपासून दोन्ही उच्चायुक्तालयांची क्षमता सध्याच्या 55 कर्मचाऱ्यांवरून 30 कर्मचाऱ्यांपर्यंत घटविणे असे काही निर्णय घेतले आहेत.

पर्यटनाच्या हंगामात या लोकप्रिय पर्यटनस्थळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल रोजी म्हटले होते की, निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्यासाठी दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांना अकल्पनीय किंमत मोजावी लागणार आहे.

“भारत प्रत्येक दहशतवादी आणि त्याच्या समर्थकांची ओळख पटवेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या टोकापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी बिहारच्या मधुबनी येथील सभेला संबोधित करताना सांगितले.

“त्यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील”, असे सांगून ते म्हणाले की, संपूर्ण देश या निर्दयी हत्यांमुळे दुःखी आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleIndia Calibrates Tough Response Amid Rising Border Tensions
Next articleAerospace Majors Vie for Supply of Fighter Jet Engines to India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here