भारताच्या हल्ल्यानंतर Nuclear Body Meeting झालेली नाही: ख्वाजा आसिफ

0

“भारताच्या लष्करी कारवाईनंतर देशात अण्वस्त्र शस्त्रसाठ्याबाबत उच्च लष्करी-नागरी प्राधिकरणाची कोणतीही बैठक झालेली नाही किंवा आयोजित करण्यात आलेली नाही,” असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पाकिस्तानी लष्कराने याआधी सांगितले होते की, पंतप्रधानांनी राष्ट्रीय कमांड अथॉरिटीची बैठक घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, माहिती मंत्र्यांकडून यावर तत्काळ प्रतिक्रिया मिळालेली नाही.

वाढता तणाव

1999 नंतर भारत-पाकिस्तानमधील हे सर्वात गंभीर लष्करी संघर्ष ठरत आहेत, ज्यात दोन्ही बाजूंनी डझनभर लोक मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिका आणि G7 गटातील सधन राष्ट्रांनी, दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.

ARY टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “तुम्ही ज्या बैठकीचा उल्लेख केलात (अणुउर्जा संघटन) तो पर्याय अस्तित्वात आहे, पण त्याबाबत बोलण्याची ही वेळ नाही. आपण त्याकडे खूप दूरचा पर्याय म्हणून पाहायला हवे.”

“राष्ट्रीय कमांड अथॉरिटीची अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि सध्या कोणतीही बैठक नियोजितही नाही.”

रुबिओ यांचा लष्करप्रमुखांना फोन

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधून, दोन्ही देशांनी तणाव कमी करावा आणि थेट संवाद पुन्हा प्रस्थापित करावा असे सांगितले.

“भारताची भूमिका नेहमीच मोजून-मापून आणि जबाबदारीने घेतलेली असते आणि आजही ती तशीच राहील,” असे जयशंकर यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये नमूद केले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इस्हाक डार, यांनी एका स्थानिक टीव्ही वाहिनीला सांगितले की, “जर भारत इथेच थांबला, तर आम्हीही इथेच थांबण्याचा विचार करू.”

तर भारतीय माध्यमांनी सांगितले की, शनिवारी भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये संवाद झाला आहे.

भारताचे ‘शत्रुत्वपूर्ण कारवायां’ना प्रत्युत्तर

भारताच्या लष्कराने सांगितले की, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“पाकिस्तान सैन्याच्या हालचाली स्पष्टपणे आक्रमक हेतू दर्शवतात आणि तणाव अधिक वाढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते,” असे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“भारतीय सशस्त्र दल उच्च परिचालन सज्जतेत आहेत आणि संघर्ष वाढवण्याची भूमिका न घेण्याचा आपला निर्धार पुन्हा स्पष्ट करतात पण याचे पालन पाकिस्तानकडूनही होणे अपेक्षित आहे.”

हल्ले आणि प्रत्युत्तर

शनिवारी सकाळी पाकिस्तानने दावा केला की, त्यांनी भारतात एकाधिक लष्करी तळांवर हल्ला केला असून त्यात उत्तरेकडील क्षेपणास्त्र साठ्याचे ठिकाणही समाविष्ट आहे.

भारताने सांगितले की उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुज येथील हवाई तळांवर मर्यादित नुकसान झाले.

पंजाबमधील अनेक हवाई तळांवर अतिवेगवान क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले आणि भारताने त्याला तात्काळ प्रत्युत्तर दिले.

जम्मू भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये 5 नागरिक ठार झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

पाकिस्तानने सांगितले की, “भारताने त्यांच्या कारवाईच्या आधी इस्लामाबादजवळील हवाई तळांसह तीन ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते, मात्र पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालीने बहुतेक क्षेपणास्त्र निष्क्रिय केली.”

अणु संघर्षाची भीती

विश्लेषक आणि मुत्सद्दी अनेक वर्षांपासून चेतावणी देत आले आहेत की, भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अणु युद्धात बदलू शकतो, विशेषतः काश्मीरप्रश्नी दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षामुळे.

गेल्या बुधवारी, भारताने पाकिस्तानातील ‘दहशतवादी पायाभूत सुविधा’ नष्ट करण्यासाठी केलेल्या हल्ल्यांनंतर, ही लढाई सुरू झाली.

भारताचे म्हणणे आहे की, ‘त्यांनी बुधवारी केलेले हल्ले हे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर होते.’

पाकिस्तानने भारताचे आरोप फेटाळले असून, त्यात आपला काही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये दररोज गोळीबार, शेलिंग आणि ड्रोन-क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण सुरू आहे.

पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी ‘X’ वर सांगितले की, “शनिवारी झालेल्या लष्करी मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन Bunyan un Marsoos‘ होते, जे कुराणातून घेतलेले असून “अतूट भिंत” असा अर्थ होतो.

श्रीनगर आणि जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज आणि सायरन वाजल्याची नोंद झाली आहे, असे रॉयटर्सच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

भारताचे हवाई हल्ले

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी रात्री उशिरा सांगितले की, “भारताने आपल्या विमानांद्वारे जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरून नूर खान, मुरिद आणि शोरकोट हवाई तळांवर हल्ले केले.”

भारताने म्हटले आहे की, “बुधवारी केलेले हल्ले ही अलीकडील संघर्षाची सुरुवात होती आणि ती पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी होती.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)


+ posts
Previous articleAs Tensions Mount, Govt Turns to Private Sector to Accelerate Defence Production
Next articleअखेर युद्धविराम! भारत व पाकिस्तानची ‘पूर्ण व तात्काळ’ युद्धविरामावर सहमती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here