पाकिस्तानचे ‘Bunyan un Marsoos’ ऑपरेशन सुरु, भारताचे चोख प्रत्युत्तर

0

पाकिस्तानने आपले सैन्य पुढील सीमावर्ती भागात हलवले असून, ‘Bunyan un Marsoos’ ऑपरेशनला सुरुवात केली आहे. दरम्यान, भारताने महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर केले प्रत्युत्तरात्मक हल्ले करत, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शनिवारी, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, “पाकिस्तानच्या लष्कराने आपले सैन्य ‘पुढील सीमावर्ती भागात हलवले आहे,’ ही कृती त्यांच्या आक्रमक हेतूचे स्पष्ट संकेत देणारी असून, यामुळे पश्चिम सीमेवर आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे”. “भारतीय सशस्त्र दल ‘उच्च ऑपरेशनल तयारीच्या स्थितीत’ आहे आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे विधान, पाकिस्तानकडून भारताविरुद्ध ‘ऑपरेशन बुनयान उन मर्सूस’ सुरू झाल्यानंतर काही तासांत आले आहे. या मोहिमेचे नाव अरबी भाषेत असून त्याचा अर्थ “अतूट भिंत” असा होतो. या कारवाईत पाकिस्तानने पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र (surface-to-surface missiles) आणि लोइटरिंग म्युनिशन्स वापरून जम्मू, काश्मीर आणि पंजाबमधील लष्करी तळांवर हल्ले केले.

भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, शुक्रवारी रात्री पाकिस्तानने श्रीनगरपासून नाळियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी समन्वयित हवाई घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी त्या वेळेत अडवून निष्फळ केल्या.

“भारतीय सशस्त्र दलांनी अचूकपणे हेरलेल्या लष्करी टार्गेट्सना तंतोतंत आणि नियोजित प्रत्युत्तर दिले,: असे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले. हल्ल्यांमध्ये रडार साईट्स, तांत्रिक पायाभूत सुविधा, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, तसेच शस्त्रसाठ्यांच्या ठिकाणांचा समावेश होता. रफिक़ी, मुरिद, चकला, रहीम यार खान, सुक्कुर आणि जुनीयामध्ये हवाई क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले. पसरूर आणि सियालकोट एव्हिएशन येथील रडार ठिकाणीदेखील लक्ष्य करण्यात आले.

भारतीय वायुदलाने शत्रूचे हल्ले रोखण्यात यश मिळवले असले, तरी विंग कमांडर सिंग यांनी मान्य केले की, उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुज येथील हवाई तळांवर उपकरणे आणि कर्मचाऱ्यांचे थोडेफार नुकसान झाले आहे.

पाकिस्तानचे ISPR प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी, नंतर याची पुष्टी केली की, “भारतीय क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने पाकिस्तानच्या नूर खान (चकला), मुरिद आणि रफिक़ी हवाई तळांवर हल्ले केले. रावळपिंडीतील नूर खान तळ हा एक महत्त्वाचा लॉजिस्टिक केंद्र असून तिथे PAF चे C-130, IL-78 आणि साब एराय AEW&C विमाने आहेत. मुरिद येथे तुर्की बनावटीचे बायरक्तर TB2 ड्रोन स्क्वॉड्रन्स असून रफिक़ी येथे JF-17, मिराज आणि हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन्स आहेत.”

भारतीय हवाई हल्ले पाकिस्तानकडून भारतीय वायुदलाच्या सिरसा तळावर करण्यात आलेल्या ‘सरफेस टू सरफेस’ क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर करण्यात आले. तो हल्ला भारतीय संरक्षण प्रणालीने अडवला होता.

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर सिंग यांनी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, “पाकिस्तानने ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, लोइटरिंग म्युनिशन्स आणि लढाऊ विमानांचा वापर करून भारताच्या पश्चिम सीमेलगत नागरी आणि लष्करी ठिकाणे लक्ष्य केली. या कृतींचे प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले,” असे सिंग यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “भारत युद्ध वाढवण्याच्या विरोधात आहे पण हेच धोरण पाकिस्तानच्या लष्कराकडूनही पाळले गेले पाहिजे.”

पाकिस्तानकडून सैन्य हालचाली सुरू राहिल्याने आणि संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने, दोन्ही बाजू आता अत्यंत सतर्क आहेत आणि या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक संघर्षाच्या शक्यतेबाबत चिंता वाढली आहे.

— रवी शंकर


+ posts
Previous articlePakistan Moves Troops to Forward Areas, Launches Operation ‘Bunyan un Marsoos’; India Strikes Back at Key Military Targets
Next articlePahalgam and Beyond – Operation Sindoor and India’s Options

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here