जम्मू आणि काश्मीरमधील अलीकडच्या काळातील सर्वात विनाशकारी दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात, मंगळवारी दुपारी पहलगाममधील नयनरम्य बैसरान पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटावर केलेल्या गोळीबारात दोन परदेशी नागरिकांसह 26 जणांचा मृत्यू झाला.
मास्टरमाइंडची ओळख पटली
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर सैफुल्ला कसूरी ऊर्फ खालिद हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याची ओळख गुप्तचर यंत्रणांनी पटवली आहे, असे सूत्रांनी सांगितले. खालिद हा पाकिस्तानातील गुजरांवाला येथून काम करत असल्याचे मानले जाते.
गुप्तचर सूत्रांनी नमूद केले आहे की यापूर्वी काश्मीरबाबत पाकिस्तानच्या बदलत्या भूमिकेबद्दल, विशेषतः 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर, त्याने असंतोष व्यक्त केला होता. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये वाढणाऱ्या अशांततेला दोष देत, खोऱ्यातील LeT च्या कारवाया कमी करण्याच्या इस्लामाबादच्या निर्णयावर त्याने जाहीरपणे टीका केली होती.
पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दोन अतिरिक्त दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असावी असा संशय आहे.
हल्लेखोरांची छायाचित्रे जारी
सुरक्षा यंत्रणांनी भयानक पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन व्यक्तींची रेखाचित्रे जारी केली आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या संशयितांची नावे आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या त्रिकुटाने मूसा, युनुस आणि आसिफ या सांकेतिक नावांखाली काम केले.
भीषण दहशतवादी हल्ला
दुपारी 2.30 च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात बंदी घातलेल्या LeT शी संलग्न असणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या (TRF) दहशतवाद्यांचा सहभाग होता. हल्लेखोरांनी तिथे असलेल्या पर्यटकांच्या गटाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला.
या घटनेनंतर संपूर्ण देशात दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे. वाचलेल्यांनी भीती आणि रक्तपात यांच्या भयानक आठवणी सांगितल्या आहेत. या भीषण हल्ल्याबद्दल देशभरातून तीव्र निषेध आणि शोक व्यक्त केला जात आहे.
सौदी अरेबियाहून मोदी परतले
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा रद्द केला आणि बुधवारी पहाटे ते नवी दिल्लीला परतले. आगमनानंतर त्यांना तात्काळ परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या (CCS) उच्चस्तरीय बैठकीचे ते अध्यक्षपद भूषवतील अशी अपेक्षा आहे.
नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून अलीकडेच घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांसह या हल्ल्यात पाच ते सहा दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे गुप्तचर माहितीवरून सूचित होते.
दहशतवादविरोधी मोहिमा सुरू
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांबरोबर हवाई हेरगिरीची मदत घेत पहलगाम प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या हत्येशी संबंधित तीन संशयितांची रेखाचित्रेही जारी केली आहेत.
NIA चाही तपासात सहभाग
सध्या सुरू असलेल्या तपासाला मदत करण्यासाठी महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक पहलगाम येथे पोहोचले आहे. हे पथक स्थानिक पोलिसांसोबत तपासात सहकार्याने काम करत आहे.
अमित शहा यांची घटनास्थळाला भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी बैसरन पठाराल भेट दिली, जिथे दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता.
त्यानंतर, त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर श्रीनगरमध्ये या घटनेतून बचावलेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या शोकाकुल कुटुंबांची भेट घेतली. या घटनेला जबाबदार असलेल्यांना योग्य ती शिक्षा मिळेल, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
या हल्ल्याच्या घटनेनंतर काही तासांतच शाह पहलगामला पोहोचले होते आणि पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.
मदतीची घोषणा
जम्मू-काश्मीर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमी झालेल्यांना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल.
घटनेच्या निषेधार्थ खोऱ्यात बंद
या घृणास्पद हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण बंद पाळला जात आहे. दहशतवादाचा निषेध करणारा गेल्या 35 वर्षांतील खोऱ्यातील हा पहिला व्यापक बंद आहे. श्रीनगर आणि इतर भागात दुकाने, व्यवसाय आणि पेट्रोल पंप बंद होते, तर सार्वजनिक वाहतूक मर्यादित होती. रस्त्यांवर खासगी वाहने दिसत असली तरी खासगी शाळा बंद होत्या. केवळ सरकारी शाळा सुरू राहिल्या.
केवळ अत्यावश्यक सेवा पुरवठादारांना काम करण्याची परवानगी होती याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. बंदचा परिणाम खोऱ्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यावर झालेला बघायला मिळाला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)