संयुक्त राष्ट्रांचे महासचिव (UN Chief) अँटोनिओ गुटेरेस यांनी, भारत आणि पाकिस्तानला ‘कमाल संयम’ बाळगण्याचे आवाहन केले आहे, कारण जम्मू-काश्मीरमधील नुकत्याच झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, तो सैनिकी संघर्षात परिवर्तित होण्याचा धोका आहे, असे त्यांनी इशारा दिला.
UN मुख्यालयात न्यू यॉर्कमध्ये सुरक्षा परिषदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना, गुटेरेस यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “दोन्ही देशांतील तणाव गेल्या कित्येक वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.”
गुटेरेस यांनी एप्रिल २२ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुनः एकदा निषेध केला. या हल्ल्यात किमान २६ नागरिक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
“नागरिकांना लक्ष्य करणे अत्यंत निषेधार्ह आहे – आणि जबाबदार असलेल्या व्यक्तींना कायदेशीर आणि विश्वासार्ह मार्गांनी न्यायाच्या कक्षेत आणले पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“या संवेदनशील क्षणी सैनिकी संघर्ष टाळणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तो सहजपणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.
संधीसाठी UN तयार
गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना युक्तिवादासाठी आणि तणाव शमवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची मध्यस्थीची भूमिका स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला.
“सैनिकी मार्गाने काहीही सुटत नाही – आता संयम राखण्याची आणि तणावाच्या कड्यावरून मागे हटण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
गुटेरेस यांनी दोन्ही देशांच्या संयुक्त राष्ट्र शांतता मिशनमध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक करत, त्या ऐतिहासिक सहकार्याच्या आधारे नव्याने संवाद सुरू होईल अशी आशा व्यक्त केली.
“संयुक्त राष्ट्र कोणत्याही अशा उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे, जो तणाव कमी करतो, राजनयिक संवाद वाढवतो आणि शांततेच्या नव्या वचनबद्धतेला चालना देतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षा मॉक ड्रिल्स
22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सर्व राज्यांना 7 मे (बुधवार) रोजी, नागरिक संरक्षणाच्या दृष्टीने सुरक्षा मॉक ड्रिल्स राबवण्याचे आदेश दिले आहेत, असे माध्यमांनी सांगितले.
1971 मध्ये भारत-पाक युद्धाच्या वेळी अशा प्रकारचा शेवटचा सराव झाला होता, त्यामुळे या आदेशाचे वेळापत्रकही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
गृह मंत्रालयाने (MHA), सर्व राज्यांना या सरावादरम्यान – हवाई हल्ल्याच्या इशारा देणारे सायरन सक्रिय करण्याचे, नागरिकांना आपली सुरक्षा कशी करावी याचे प्रशिक्षण देण्याचे, तसेच आपत्कालीन परिस्थीत ब्लॅकआउट करण्याबाबत सूचना देण्याचे आणि महत्वपूर्ण संसाधनांचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे सुरक्षित स्थलांतर आणि जतन करण्याबाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)