देशभरात 7 मे रोजी Civilian Mock Drills घेण्याचे केंद्राचे निर्देश

0
Mock Drills
प्रातिनिधीक फोटो

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने देशांतील काही राज्यांना, 7 मे रोजी Civilian Mock Drills आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून “शत्रूचे संभाव्य हल्ले” झाल्यास, त्या आपत्तीजन्य परिस्थीतीत काय करावे याची सर्वसामान्य नागिरकांना कल्पना असेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या नागरी सरावात – हवाई हल्ल्याची चेतावणी देण्यासाठी वाजवण्यात येणारे सायरन ओळखणे, नागरी आणि विद्यार्थ्यांसाठी संरक्षण प्रशिक्षण, ब्लॅकआउट प्रक्रियेचा सराव आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा छद्मवेश (camouflage) कसा करावा याच्या प्रशिक्षणाचा समावेश असेल. नवीन अपडेट केलेली आपत्कालीन स्थलांतर योजना देखील, या सरावादरम्यान प्रत्यक्षात अमलात आणली जाणार आहे.

22 एप्रिल रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला तणाव अधिक तीव्र झाला आहे. या हल्ल्यात 25 भारतीय पर्यटक आणि एका स्थानिक रहिवाशाचा मृत्यू झाला होता.

  • नागरी सरावात कोणत्या गोष्टींचा समावेश असेल?हवाई हल्ल्याच्या चेतावणीसाठी सायरन वाजवले जातील.
  • काही निवडक भागांमध्ये ब्लॅकआउटचा (दिवे बंद ठेवण्याचा) सराव केला जाईल.
  • नागरीकांना – विशेषतः विद्यार्थ्यांना, हवाई किंवा जमिनीवरील हल्ल्यावेळी कोणती सुरक्षा पावले उचलायची याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • वीज प्रकल्प आणि संरक्षण-संबंधित पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना कसे लपवायचे हे सांगितले जाईल.
  • आपत्कालीन स्थलांतर योजनेचा सराव घेतला जाईल.

दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचा धडाका

Mock Drills च्या निर्णयासोबतच, दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक उच्चस्तरीय बैठकांचा धडाका सुरू आहे. भारत पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी धोरणात्मक तयारी करत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांनी सोमवारी जपानचे समकक्ष जनरल नाकातानी सान यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली, तर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत स्वतंत्र चर्चा केली.

या बैठकीत, भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तीव्र निषेध केला आणि सीमापार धोके रोखण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर चिंता व्यक्त केली आणि जपानला पीओकेमध्ये गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला, कारण अशा गुंतवणुकीचा वापर दहशतवादासाठी होऊ शकतो.

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, यांनी पंतप्रधानांसोबत काही महत्त्वाच्या लष्करी खरेदी आणि धोरणात्मक प्राधान्यांवर चर्चा केल्याचे समजते, जरी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सिंह हे संरक्षण मंत्रालयाचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत आणि लष्करी धोरण ठरवण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

गेल्या 10 ते 12 दिवसांत, भारतीय नौदलाचे प्रमुख- एडमिरल दिनेश त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी स्वतंत्रपणे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि सध्याच्या सुरक्षेच्या परिस्थितीबाबत चर्चा केली.

भारताने पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले असून, पंतप्रधान मोदींनी “कल्पनाही करता येणार नाही असे उत्तर देऊ” असे ठामपणे सांगितले आहे. पाकिस्तानने हल्ल्यात सहभाग असल्याचे नाकारले असले, तरी त्यांनी भारताने लष्करी कारवाई केली तर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleCentre Directs States to Conduct Civilian Mock Drills on May 7 Amid Rising Security Concerns
Next articleजागतिक विमान कंपन्यांचा Pakistani Airspace टाळण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here