जम्मू आणि काश्मीर तसेच शेजारच्या पंजाबमधील अमृतसरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा स्फोटांचे प्रतिध्वनी ऐकू आला. भारताच्या सशस्त्र दलांनी सुमारे 30 वर्षांतील पाकिस्तानशी झालेल्या सर्वात तीव्र चकमकीदरम्यान अनेक पाकिस्तानी ड्रोन अडवल्याच्या बातम्या दिल्या आहेत.
अमृतसरमधील स्फोट – अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील तीन दिवसांच्या संघर्षात तेथे ऐकू आलेले हे पहिले स्फोट – जागतिक शक्तींना घाबरवणाऱ्या शत्रुत्वात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जम्मूमध्ये रात्रीच्यावेळी आकाशात प्रक्षेपित झालेल्या चमकदार वस्तू दिसून आल्या. या प्रदेशाच्या राजधानीत दुसऱ्या रात्री झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर तिथे ब्लॅकआउट करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी आणि रॉयटर्सच्या पत्रकाराने सांगितले.
“ड्रोन दिसले आहेत… ते काम करत आहेत,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानी ड्रोन मोठ्या प्रमाणात दिसले
भारतीय लष्कराने शुक्रवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या पश्चिम आणि वायव्येकडील विस्तृत भागात, काश्मीर आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांपासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत 26 ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन दिसले.
श्रीनगरमधील विमानतळाजवळ दहा स्फोटांचे आवाज ऐकू आले. या प्रदेशात आणखी काही ठिकाणी स्फोट झाले, असे इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. गुरुवारी रात्री त्याच भागात हल्ले केल्याचा भारताचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला होता.
गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बुधवारी पाकिस्तानमधील “दहशतवादी पायाभूत सुविधा” म्हणून वर्णन केलेल्या अनेक भागात हल्ला केल्यापासून जुने शत्रू एकमेकांशी भिडत आहेत.
सीमेपलीकडून हिंसाचार वाढला
पर्यटकांवर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा भारताचा आरोप फेटाळून लावला. दोन्ही देशांनी सीमेपलीकडून गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव केला आहे. याखेरीज दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
सीमेच्या दोन्ही बाजूंनी झालेल्या या माऱ्यामुळे बुधवारपासून अंदाजे 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
भारतीय लष्कराने शुक्रवारी सांगितले की पाकिस्तानी सीमेजवळील पंजाबमधील फिरोजपूर येथे एका सशस्त्र ड्रोनमुळे एका कुटुंबाला गंभीर दुखापत केली.
पर्यटक आणि गावकरी यांनी सीमावर्ती भागातून स्थलांतर केले आहे. स्थानिक रहिवाशांची अन्नसाठा करून ठेवण्यासाठी झुंबड उडाली आहे. काश्मीर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले.
आयपीएल स्थगित
भारतीय क्रिकेट मंडळाने शुक्रवारी आयपीएलमधील पुढील सर्व सामने स्थगित केले तर पाकिस्तानच्या सुपर लीगचे उर्वरित आठ सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.
1947 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. या देशांमध्ये आतापर्यंत तीन युद्धे लढली गेली आहेत, त्यापैकी दोन काश्मीरवरून झाली आहेत. शिवाय अनेक वेळा छोटेमोठे संघर्षही सुरू असतात.
वॉशिंग्टनमध्ये, व्हाईट हाऊसने सांगितले की अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संघर्ष कमी करू इच्छितात याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आरोप-प्रत्यारोप
भारताने पाकिस्तानमधील लक्ष्यांवर ड्रोनने हल्ला केला आणि एक हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली, असे भारतीय हवाई दलाच्या अधिकारी व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी पाकिस्तानी हल्ल्यांबद्दलचे भारताचे पूर्वीचे आरोप “निराधार आणि दिशाभूल करणारे” असल्याचे सांगत फेटाळून लावले होते आणि म्हटले होते की पाकिस्तानने कोणतीही “आक्षेपार्ह कृती” केलेली नाही.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) शुक्रवारी पहाटे सीमेपलीकडून झालेल्या जोरदार गोळीबारात एका बाळासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला आणि 29 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
1999 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल प्रदेशात दोन्ही देशांमधील मर्यादित संघर्षानंतरची ही सर्वात घातक लढाई आहे.
अमृतसरमध्ये सायरन वाजले
शुक्रवारी अमृतसरमध्ये दोन तासांहून अधिक काळ सायरन वाजत होते. या शहरात शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर आहे.
विमानतळ बंद असल्याने पर्यटकांना रस्तामार्गे शहरातून बाहेर पडावे लागले.
“आम्हाला खरोखरच इथे राहायचे होते, परंतु मोठा आवाज, सायरन आणि ब्लॅकआउटमुळे आमची रात्रीची झोप उडाली आहे. घरी असलेले आमचे कुटुंब आमच्यासाठी काळजीत पडले आहेत, म्हणून आम्ही कॅब बुक केली आहे आणि निघून जात आहोत,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका ब्रिटिश नागरिकाने सांगितले.
भारताच्या वाळवंटी राज्यातील राजस्थानमधील बिकानेर भागात शाळा आणि कोचिंग सेंटर बंद करण्यात आले होते. पाकिस्तान सीमेजवळील रहिवाशांनी सांगितले की त्यांना नातेवाईकांसह इतरत्र जाण्याचा किंवा सरकारने व्यवस्था केलेल्या निवासस्थानाचा वापर करण्याचा विचार करण्यास सांगण्यात आले होते.
गुजरातमधील भूजच्या दक्षिणेस, पाकिस्तान सीमेजवळील लोकांचे स्थलांतर करण्यासाठी गरज भासल्यास पर्यटक बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)