ड्रोन युद्धाचा विस्तार: पाकच्या प्रमुख हवाई संरक्षण केंद्रांवर भारताचा हल्ला

0

भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी क्षेत्रांवर ड्रोन तसेच क्षेपणास्त्रांचा एक मोठा हल्ला रोखल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधील अनेक हवाई संरक्षण प्रणाली आणि लष्करी लक्ष्यांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. गुरुवारी पहाटे सीमेपलीकडून हल्ले सुरू झाले आणि रात्री उशिरापर्यंत ते सुरूच राहिले.

“पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी 8 आणि 9 मे रोजी मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर युद्धसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा युद्धबंदीचे उल्लंघन (CFVs) केले,” असे भारतीय लष्कराने एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे. “ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य उत्तर देण्यात आले,” असेही त्यात नमूद केले आहे.


रात्र होताच, पाकिस्तानने त्यांचे हल्ले वाढवले, ज्यात जैसलमेर हवाई तळ, अमृतसर आणि जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी प्रतिष्ठानांसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. सांबा आणि अर्नियासारख्या नागरी भागातवरही याचा परिणाम झाला. कडक सुरक्षा असलेल्या जम्मू विमानतळाजवळ झालेल्या स्फोटांमुळे शहरात घबराट निर्माण झाली.

“जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून हल्ला केला. कोणतेही नुकसान झालेले नाही. भारतीय सशस्त्र दलांनी kinetic आणि non kinetic  अशा दोन्ही उपाययोजनांचा  मानक कार्यपद्धतींनुसार वापर करत या धोक्यांना निष्प्रभ केले,” असे मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी (HQ IDS) ने एक्सवर एका वेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने (IAF) केलेल्या अचूक ड्रोन हल्ल्यांचा समावेश होता. ज्यामध्ये लाहोरमध्ये चिनी बनावटीचे HQ-9 जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि रडार प्रणाली नष्ट केल्याचे वृत्त आहे.

एका अधिकृत निवेदनात, पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून “उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा” प्रयत्न केल्याचा भारताने आरोप केला. भारताच्या Integrated Counter-Unmanned Aerial Systems (CUAS) ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे धोके निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानी हल्ल्यांचा पुरावा म्हणून अडवून नष्ट करण्यात आलेल्या दारूगोळ्यांच्या साठ्यांचे अवशेष जप्त केले जात असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत “अनेक ठिकाणी” हवाई संरक्षण रडार आणि क्षेपणास्त्र प्रणालींना लक्ष्य केले, असे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराचा संदर्भ देत, “लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे,” असे त्यात म्हटले आहे.


8 मे 2025 रोजी पाकिस्तानच्या कराची शहराबाहेरील भागात एक ड्रोन पाडण्यात आले.

एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीमध्ये सामान्यतः रडार, कमांड-अँड-कंट्रोल सेंटर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असतात, जी ड्रोन, विमाने आणि क्षेपणास्त्रे यांसारख्या हवाई धोक्यांपासून संरक्षण प्रदान करतात. वृत्तानुसार भारतीय सैन्याने लाहोर साइटवर केलेल्या हल्ल्यात इस्रायली-निर्मित हार्पी लोटेरिंग दारूगोळा – ज्याला “कामिकाझे ड्रोन” म्हणून ओळखले जाते – वापरला.

भारताच्या प्रत्युत्तरानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की भारताने नेहमीच संयम बाळगला आहे आणि संवादाद्वारे शांततापूर्ण उपाय शोधला आहे, परंतु चिथावणी दिल्यास निर्णायक कारवाई करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही. “जर कोणी आमच्या संयमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कालच्याप्रमाणेच कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे ते म्हणाले.

रवी शंकर


Spread the love
Previous articleभारताच्या S-400 ने पाकिस्तानचा हवाई हल्ला कसा हाणून पाडला?
Next articleभारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही – व्हॅन्स यांची स्पष्टोक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here