उरीमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा, सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

0

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 27 पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्याचा साठा जप्त करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.

“सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, सध्या सुरू असलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्याचा साठा जप्त करण्यात आला आहे,” असे चिनार कॉर्प्सने एक्सवर लिहिले आहे.

लष्कराने सांगितले की, दोन ते तीन अज्ञात दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरी नाला येथील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सैनिकांनी त्यांना अडवले आणि आव्हान दिले, परिणामी चकमक सुरू झाली.

ही मोहीम अद्याप सुरू असल्याचे लष्कराने सांगितले.

“23 एप्रिल 2025 रोजी, अंदाजे 2-3 यूआय दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरी नाला इथल्या सामान्य भागातून सरजीवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, एलसीवरील सतर्क टीपीएसने त्यांना आव्हान दिले आणि त्यांना अडवले, परिणामी गोळीबार झाला,”असे चिनार कॉर्प्सने एक्सवर पोस्ट केले.

पहेलगाम येथील दहशतवादी हल्ला

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या भारत दौऱ्यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात, बंदूकधाऱ्यांनी मंगळवारी किमान 27 लोकांना ठार केले. अनेकांना त्यांचा धर्म  विचारत बिगर मुस्लीम म्हणून ओळख पटवून त्यांना ठार करण्यात आले. या हल्ल्यानंतर देशव्यापी आक्रोश आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

पहलगामच्या बैसरान खोऱ्याच्या वरच्या पठारावर दुपारी 2.30 च्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या ठिकाणी फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येते.

दहशतवादी लपून बसले होते आणि हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचे मानले जाते.

हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी पीडितांना त्यांचा धर्म विचारला होता.

पर्यटक या भागात घोडेस्वारीचा आनंद लुटत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे. पहलगाममध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.

मोदी भारतात परतले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा रद्द केला आणि ते बुधवारी नवी दिल्लीला परतले.

नवी दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली.

गृहमंत्री अमित शहा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरमध्येच आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleRussia Reported To Offer Concession, Ukraine Keen For Ceasefire
Next articleJ & K terror attack: 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here