जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. गेल्या 20 वर्षांतील या भागातील ही सर्वात प्राणघातक घटना असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या संघराज्य प्रदेशातील पहलगाम भागात असलेल्या पठारावर मंगळवारी हा हल्ला झाला. मृतांमध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. अलिकडच्या वर्षांत भारतविरोधी बंडखोरी कमी झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यात पर्यटनाला चालना मिळाली होती. मात्र आता तिथली सापेक्ष शांतता भंग पावली आहे.
मोदी भारतात परतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दोन दिवसीय दौरा रद्द केला आणि ते बुधवारी सकाळी नवी दिल्लीला परतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील अशा कठीण आणि दुःखाच्या काळात आपल्या लोकांसोबत राहण्यासाठी अमेरिका आणि पेरूचा दौरा आटोपता घेतला असल्याचे त्यांच्या मंत्रालयाने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोदींनी विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि 05.30 (जीएमटी) वाजता विशेष सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती.
‘द काश्मीर रेझिस्टन्स’ नावाच्या फारशा माहिती नसलेल्या दहशतवादी गटाने एका सोशल मीडिया संदेशात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या प्रदेशात 85 हजारांहून अधिक “बाहेरील लोक” स्थायिक झाले आहेत, ज्यामुळे “जनसांख्यिकीय बदल” झाला आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
LeTशी संलग्न काश्मीर रेझिस्टन्स
भारतीय सुरक्षा संस्थांच्या म्हणण्यानुसार “काश्मीर रेझिस्टन्स” ही लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी संलग्न आहे. काश्मीरमधील बंडखोरीला आपण केवळ नैतिक आणि राजनैतिक पाठबळ देत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पर्यटकांच्या जीवितहानीबद्दल आम्ही चिंतित आहोत. आम्ही मृतांच्या जवळच्या लोकांप्रति शोक व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत झाली आहे. मात्र त्याच पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी डझनभरांहून अधिक स्थानिक संघटनांनी प्रदेशात बंदची हाक दिली आहे.
अनेक शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटक या भागातून मोठ्या संख्येने आता बाहेर पडत असल्याने श्रीनगर येथून विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीनगरला उर्वरित देशाशी जोडणाऱ्या मुख्य महामार्गाचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले असल्याने तो दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळेही विमानांची मागणी वाढली होती, असे त्यांनी सांगितले.
तात्काळ मदत उपाययोजनांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून दिल्लीला दोन आणि मुंबईला दोन अशा चार विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे, पर्यटकांना बाहेर पडण्याच्या दृष्टीने त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे सज्ज ठेवण्यात आली आहेत,” असे विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नायडू यांनी सर्व विमान चालकांसोबत तातडीची बैठक घेतली आणि या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडणार नाही याची खातरजमा करण्यासाठी नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश दिले.
काश्मीरमधील दहशतवाद्यांचा हिंसाचार
1989 मध्ये भारतविरोधी बंडखोरी सुरू झाल्यापासून दहशतवादी हिंसाचाराने मुस्लिमबहुल काश्मीरला ग्रासले आहे. या प्रदेशावर आपलाच हक्क असल्याचा दावा भारत आणि पाकिस्तान दोघांनीही केला आहे. अलिकडच्या वर्षांत हिंसाचार कमी झाला असला तरी आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत.
भारताने 2019 मध्ये काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द केला. त्यानंतर राज्याचे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या दोन संघराज्य प्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. या निर्णयामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना बाहेरील लोकांना अधिवास अधिकार जारी करण्याची मुभा मिळाली, ज्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळू शकल्या आणि त्या प्रदेशात जमीन खरेदी करता आली.
यामुळे पाकिस्तानशी असलेले संबंध बिघडले, जो या प्रदेशावरही दावा करतो. हा वाद अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील कटु वैमनस्य आणि लष्करी संघर्षाचे मूळ आहे.
अलिकडच्या वर्षांत काश्मीरमध्ये पर्यटकांवर होणारे हल्ले दुर्मिळ झाले आहेत. पर्यटकांवर शेवटचा मोठा हल्ला जूनमध्ये झाला होता, जेव्हा दहशतवादी हल्ल्यात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळून किमान नऊ जण ठार आणि 33 जण जखमी झाले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)