22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला त्वरित आणि अतिशय चोख प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी Operation Sindoor हाती घेतले. या अंतर्गत पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (PoJK) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
पहाटे 1.05 ते 1.30 या दरम्यान केलेल्या अचूक हल्ल्यांचे वर्णन सरकारने “केंद्रित, मोजून मापून आणि सौम्य स्वरूपाचे” असे केले. सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, चार तळ पाकिस्तानमध्ये आणि पाच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये होते. “विश्वसनीय गुप्तचर माहिती” वर आधारित या सर्व तळांना लक्ष्य करण्यात आले होते.
“पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली होती,” असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी नवी दिल्ली येथे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
“नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले.”
लक्ष्य होते लष्कर आणि जैश यांचे तळ
हल्ला झालेल्या ठिकाणांमध्ये मुरीदके येथील मरकझ तैयबा – बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय – आणि मुझफ्फराबाद तसेच गुलपूरमधील सवाई नालासारख्या छावण्यांचा समावेश होता. या तळावरील दहशतवादी भारतीय नागरिक आणि यात्रेकरूंवर भूतकाळात झालेले तसेच अलीकडे करण्यात आलेल्या हल्ल्यांशी संबंधित होते.
“ही ठिकाणे दहशतवाद्यांच्या भरती, शिकवण आणि लाँचिंगची केंद्रे आहेत,” विंग कमांडर सिंग म्हणाले. “गेल्या तीन दशकांपासून, पाकिस्तानने त्याच्या हद्दीत आणि पीओकेमध्ये अशा छावण्यांचे जाळे स्थापित केले आहे.”
या कारवाईत नागरी क्षेत्रे काटेकोरपणे टाळण्यात आली यावर अधिकाऱ्यांनी भर दिला
“ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली,” कर्नल कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “आमचे उद्दिष्ट सीमेपलीकडून दहशतवादात थेट सहभागी असलेली सुविधा केंद्रे निष्क्रिय करणे होते.”
OPERATION SINDOOR#JusticeServed
Target 1 – Abbas Terrorist Camp at Kotli.
Distance – 13 Km from Line of Control (POJK).
Nerve Centre for training suicide bombers of Lashkar-e-Taiba (LeT).
Key training infrastructure for over 50 terrorists.
DESTROYED AT 1.04 AM on 07 May 2025.… pic.twitter.com/OBF4gTNA8q
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 7, 2025
राजनैतिक परिणाम
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) सारख्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान संरक्षण देत असल्याचा आणि त्यांना जबाबदार धरण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप परराष्ट्र सचिव मिस्री यांनी केला.
“25 एप्रिलच्या निवेदनात TRFचे संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर आणलेला दबाव यासाठी स्पष्ट पुरावा आहे,” असे मिस्री म्हणाले, भारताने टीआरएफला लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन्ही संघटनांशी जोडणारे पुरावे सादर केले आहेत.
पहलगाम हत्याकांडाला “क्रूर” म्हणत मिस्री म्हणाले की, अनेक बळी – पर्यटक आणि नागरिक – यांच्या डोक्यात जवळून गोळ्या झाडण्यात आल्या, हा एक डावपेच होता ज्याचा उद्देश 2023 मध्ये 23 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या काश्मीरच्या भरभराटीच्या पर्यटन उद्योगाला धक्का देणे होता.
पाकिस्तानने नागरिकांच्या जीवितहानीबाबतचे दावे फेटाळले
पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी पायाभूत सुविधा अस्तित्वात असल्याचे नाकारले आणि भारतावर त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दावा केला की सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये एका मुलासह आठ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांनी भारतीय विमान पाडल्याचा आणि कैद्यांना ताब्यात घेतल्याचा दावाही केला आहे. मात्र हे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत.
वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने इस्लामाबादचे दावे “निराधार” असल्याचे सांगत हे ऑपरेशन “लष्करी कारवाई नव्हे तर लक्ष्य केंद्रित दहशतवादविरोधी हल्ला” असल्याचे म्हटले.
जागतिक प्रतिक्रिया आणि धोरणात्मक संदेश
चीन आणि युएई यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या कार्यालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले.
परराष्ट्र सचिव मिस्री यांनी अधोरेखित केले की Operation Sindoor हे प्रत्युत्तरात्मक आणि पूर्वसूचक दोन्ही होते.
“आमच्या गुप्तचर यंत्रणेने पुढील नियोजित हल्ले ओळखले होते,” ते म्हणाले. “दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा एक आवश्यक आणि संयमी प्रतिसाद होता.”
त्यांनी पुढे सांगितले की भारताने प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत कृतीयोग्य गुप्तचर माहिती सामायिक केली आहे आणि सीमापार दहशतवादाचा सामना करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.
“संदेश स्पष्ट आहे,” असा निष्कर्ष कर्नल कुरेशी यांनी मांडला. “भारतीय नागरिकांवरील हल्ल्यांचे परिणाम बघायला मिळतील. आमचा प्रतिसाद जलद, न्याय्य आणि लक्ष्य गाठणारा असेल.”
रवी शंकर