लष्करी प्रबलतेमुळे भारत-पाकिस्तान संघर्ष अधिक धोकादायक बनू शकतो

0
भारत-पाकिस्तान
3 फेब्रुवारी 2021 रोजी, बेंगळुरूच्या येलहंका हवाई तळावर "एरो इंडिया 2021" या एअर शो दरम्यान, भारतीय हवाई दलाची राफेल लढाऊ विमाने उड्डाण करत आहेत. फोटो सौजन्य: रॉयटर्स/सॅम्युअल राजकुमार/फाइल फोटो

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांनी, 2019 मधील संघर्षानंतर आपआपली लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. या लष्करी प्रबलतेमुळे, अगदी मर्यादित स्वरूपाच्या संघर्षातही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला असल्याचे, माजी लष्करी अधिकारी आणि संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानचा दावा आहे की, ‘गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल, नवी दिल्लीने इस्लामाबादवर आरोप केले असून, भारत आता लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या हल्ल्याला ‘सडेतोड आणि त्यांच्या कल्पनेपलीकडील’ प्रत्युत्तर देणार असल्याची शपथ घेतली आहे.

एकीकडे पाकिस्तानने या हल्ल्यातील सहभाग नाकारला आहे, पण दुसरीकडे भारताकडून जर टार्गेट केले गेलो, तर त्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे.

2019 संघर्षाची पार्श्वभूमी

2019 मध्ये, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करत ‘दहशतवादी तळं’ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता.

त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही हवाई कारवाई करत, भारताचे एक विमान पाडले होते. या कारवाया दोन दिवस चालल्या होत्या.

दोन्ही देशांनी 1948, 1965 आणि 1971 मध्ये, तीन युद्धे लढली आहेत आणि विशेषतः काश्मीरवरून दोघांच्यात अनेकवेळा संघर्ष झाले आहेत.म

मुबलक अण्वस्त्र साठा

दोन्ही देशांनी 1990 च्या दशकात, मुबलक अण्वस्त्र संपत्ती प्राप्त केली. काश्मीर हे आजही जगातील सर्वात संवेदनशील आणि धोकादायक ठिकाणांपैकी एक मानले जाते.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दोन्ही बाजूंनी अण्वस्त्रांचा वापर अंतिम टप्प्यातच होईल, मात्र दोन्हीकडील मुबलक अण्वस्त्र साठ्यामुळे, अगदी मर्यादित स्वरुपातील संघर्षही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

या संघर्षात विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा समावेश असू शकतो. मात्र दोन्ही बाजू तुल्यबळ असल्या तरी, भारताकडील अधिक संसाधने दीर्घकालीन संघर्षात निर्णायक ठरू शकतात.

“दोन्ही देशांतील निर्णयकर्त्यांकडे, 2019 च्या तुलनेत यावेळेचा संघर्ष दीर्घकाळ सुरू ठेवण्याची आणि वाढवत नेण्याची क्षमता अधिक आहे,” असे वॉशिंग्टनमधील थिंक-टँक स्टिमसन सेंटर येथील- साउथ एशिया प्रोग्राममधील अनिवासी फेलो फ्रँक ओ’डोनेल म्हणाले, कारण त्यांनी त्यावेळी अण्वस्त्रांचा वापर न करता संघर्ष करण्यात यश मिळवले होते.

“मात्र एखाद्या चुकीच्या कृतीने अनावधानाने संघर्ष उफाळून येऊ शकतो, हे दोघांनी लक्षात घेणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.

नवीन लष्करी साधने

2019 नंतर दोन्ही देशांनी नवे लष्करी उपकरणे विकत घेतली आहेत, ज्यामुळे पारंपरिक हल्ल्यांचे नवीन पर्याय उघडले आहेत.

“दोन्ही देशांना असे वाटते आहे की, ते मागच्या वेळेपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहेत,” असे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधक मुहम्मद फैसल म्हणाले… “पण प्रत्यक्ष लढाईतच खरी परिस्थिती समजेल,” असेही ते म्हणाले.

भारताने आता फ्रेंच बनावटीची 36 राफेल फायटर जेट्स ताफ्यात समाविष्ट केले असून, आणखी फायटर्सचाही येत्या काही काळात समावेश होणार आहे. 2019 मध्ये भारत केवळ जुन्या रशियन विमांवर अवलंबून होता.

राफेल VS J-10 जेट्स

भारताला उत्तर देण्यासाठी म्हणून, पाकिस्तानने चीनकडून प्रगत J-10 लढाऊ विमाने 2022 पासून विकत घेतली आहेत. लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या मते, पाकिस्तानकडे किमान 20 J-10 Jet विमाने आहेत.

राफेलमध्ये ‘मेटिओर’ ही दूर अंतरावरून टार्गेट करणारी क्षेपणास्त्रे आहेत. त्याला समकक्ष अशी ‘PL-15’ क्षेपणास्त्रे J-10 मध्ये आहेत, असे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

2019 मध्ये दोन्ही देशांच्या वायुदलांमध्ये असलेल्या कमकुवतपणा लक्षात घेऊन, भारताने रशियाचे S-400 आणि पाकिस्तानने चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली घेतली आहे.

‘कारवाईसाठी मागणी’

“काही बाबतीत आपण 2019 च्या तुलनेत अधिक चांगल्या स्थितीत आहोत,” असे भारतीय हवाई दलाचे माजी एअर व्हाइस मार्शल अनिल गोलानी यांनी म्हटले आहे.

“देशात कारवाईसाठी जोरदार मागणी आहे, पण माझ्या वैयक्तिक मते भारत आणि पाकिस्तान दोघेही सर्वसमावेशक युद्ध टाळू इच्छितात,”  असेही ते म्हणाले.

या संघर्षावर — भारताचा प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तानचा जवळचा मित्र आणि प्रमुख लष्करी पुरवठादार असलेल्या चीनचा प्रभाव आहे.

अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे, पण कोणताही संघर्ष झाल्यास तो चीनच्या हवाई शक्तीची चाचणी म्हणून पाहिला जाईल.

PL-15 क्षेपणास्त्र अद्याप प्रत्यक्ष युद्धात वापरले गेलेले नाही.

“हा संघर्ष पाश्चिमात्य वि. चिनी तंत्रज्ञानामधील चढाओढ ठरू शकतो,” असे फैसल म्हणाले. “भारतासाठी प्रश्न असा आहे की, पाकिस्तान सीमेवर किती विमानतळे तैनात करावीत, कारण त्याला चीनच्या सीमेकडेही लक्ष ठेवावे लागते आहे.”

पाकिस्तानचे F-16

पाकिस्तानकडे जुनी F-16 लढाऊ विमाने आहेत, जी त्यांनी अमेरिकेसोबत चांगले संबंध असताना घेतली होती.

2019 मध्ये पाकिस्तानने हे लढाऊ विमान वापरले होते, ज्यामुळे भारताने अमेरिकेप्रती रोष दर्शवला होता. आता मात्र भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध खूप अधिक घनिष्ठ आहेत.

त्यामुळे यावेळी पाकिस्तानने F-16 ऐवजी आधुनिक J-10 चा वापर करण्याची शक्यता अधिक आहे.

तथापि, ड्रोन्स किंवा जमिनीवरून मारक क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे, कारण यामध्ये पायलटला धोका नसतो.

भारताने इस्रायलकडून लढाऊ क्षमतायुक्त Heron Mark 2 ड्रोन घेतले असून, अमेरिकन प्रीडेटर ड्रोनही मागवले आहेत.

पाकिस्तानने तुर्कीचे Bayraktar TB2 आणि Akinci ड्रोन घेतले आहेत, जे युक्रेनने रशियाविरुद्ध वापरले होते.

पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी

या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने शनिवारी 450 किलोमीटर अंतराची ‘सरफेस टू सरफेस’ क्षेपणास्त्र चाचणी केली. या चाचणीद्वारे पाकिस्तानने कोणत्याही आक्रमणास प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी असल्याचे दाखवले.

पाकिस्तानकडे जमिनीवरून, पाण्यातून आणि आकाशातून डागता येणाऱ्या लघु व मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची श्रेणी आहे.

भारताकडून या चाचणीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.

भारताकडे सुमारे 300 किमी पल्ल्याचा ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र तसेच अग्नी मालिकेतील आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत.

2019 मधील संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढण्याच्या मार्गावर होता, परंतु अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती शांत झाली.

भारत यावेळी अधिक तीव्र कारवाई करू शकतो

पाकिस्तानी हवाई दलाचे माजी वैमानिक कैसर तुफैल म्हणाले, “भारत 2019 मध्ये, प्रतिबंधात्मक क्षमता करू शकला नाही, त्यामुळे यावेळी तो अधिक प्रभावी कारवाई करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे धोके वाढतील.”

2019 नंतर, पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, ‘राफेल फायटर नसल्याने आपल्याला तोटा झाला आणि जर राफेल असते तर संघर्षाचा निकाल वेगळा असता.’

“2019 च्या तुलनेत भारताने आता एक पाऊल पुढचे टाकले, तर ते अत्यंत धोकादायक ठरेल,”  असे तुफैल म्हणाले.

“दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधला संघर्ष अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)


+ posts
Previous articleAfter Air Force Briefing, PM Modi Holds Key Security Meeting with Defence Secretary
Next articlePutin Dials PM Modi Offers Support in Fight Against Terrorism

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here