संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, सोमवारी नवी दिल्ली येथे जपानचे समकक्ष जनरल नाकातानी सान यांच्याशी भेट घेतली. यावेळी त्यांनी, काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या द्विपक्षीय बैठकीदरम्यान, नाकातानी यांनी दहशतवादाविरोधी लढ्यात भारताप्रती एकात्मतेची भावना दर्शवत, जपानचा भारताला पाठिंबा असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
“पहलगाम हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो,” असे नाकातानी यांनी बैठकीच्या सुरुवातीला राजनाथ सिंह यांना सांगितले.
बैठकीत दोन्ही मंत्र्यांमध्ये, प्रादेशिक सुरक्षेची स्थिती आणि भारत आणि जपान दरम्यानचे संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या उपाययोजना यावर चर्चा झाली. राजनाथ सिंह यांनी जपानच्या या समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला सहानभूती दर्शवल्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानतो. भारत-जपान संरक्षण संबंध दृढ करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मी कौतुक करतो.”
संरक्षण मंत्रालयानुसार, ही बैठक द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने घेण्यात आली. ही सहा महिन्यांत झालेली दुसरी भारत-जपान संरक्षणमंत्र्यांची बैठक होती. याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये, लाओसमध्ये झालेल्या ASEAN संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीच्या अनुषंगाने दोघे भेटले होते.
It was a delight to meet Japan’s Defence Minister Gen Nakatani San in New Delhi. India shares a Special, Strategic and Global partnership with Japan. During the bilateral meeting we discussed defence cooperation and regional security. Both sides condemned terrorism in all forms… pic.twitter.com/cqd7CWyxLS
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 5, 2025
भारत आणि जपान दोघेही ‘क्वाड’ गटाचे सदस्य असून, लष्करी समन्वय वाढवण्याच्या दिशेने काम करत आहेत. त्यात लॉजिस्टिक पुरवठा शेअरिंग करारावरही चर्चा सुरू आहे. 2014 मध्ये दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीला “विशेष धोरणात्मक व जागतिक भागीदारी” (Special Strategic and Global Partnership) म्हणून मान्यता देण्यात आली होती, ज्यामध्ये संरक्षण व सुरक्षा हे मुख्य आधारस्तंभ आहेत.
अलीकडच्या काळात, भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत झाले आहेच, जे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरतेसाठी त्यांच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे.
टीम भारतशक्ती