
रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांनी, 22 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि दहशतवादाविरोधात रशियाचा भारताला पाठिंबा असल्याचे सांगितले. पहलगामच्या या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता, त्याविष्यी पुतिन यांनी मनापासून शोक व्यक्त करत, कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात तडजोड न करता भारताची जागतिक पातळीवर लढण्याची गरज अधोरेखित केली.
या संवादादरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया संबंधांच्या “विशेष आणि सवलतीच्या धोरणात्मक भागीदारी”चा पुनरुच्चार केला. त्यांनी यावेळी नमूद केले की, “भारत-रशिया संबंधांवर कोणत्याही बाह्य दबावाचा परिणाम होत नाही आणि विविध क्षेत्रांमध्ये ही भागीदारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होते आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी “ग्रेट पॅट्रिऑटिक वॉर” च्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि रशियन जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, “विजय दिन ही दोन्ही देशांसाठी सामायिक स्मरणाची संधी आहे. या स्मृतीदिनानिमित्त मास्कोमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी, पुतिन यांना भारताच्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी यावेळी पुन्हा एकदा आमंत्रित केले, जे आमंत्रण पुतिन यांनी मनापासून स्विकारले.
मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यंदाच्या 9 मे रोजी होणाऱ्या, विजय दिन पथसंचलनामध्ये सहभागी होणार नाहीत. अधिकृत सूत्रांनुसार, या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात.
दरम्यान, रशियन मीडिया ‘स्पुतनिक’च्या वृत्तानुसार, रशिया भारताला दुसऱ्या तलवार श्रेणीतील ‘तमाल’ ही स्टील्थ युद्धनौका 28 मे रोजी हस्तांतरित करणार आहे. ही युद्धनौका जून 2025 मध्ये, भारतीय समुद्रात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. 2016 च्या करारानुसार भारताने घेतलेल्या परकीय युद्धनौकांमधील ही शेवटची नौका आहे. त्यानंतर भारतीय नौदल पूर्णतः स्वदेशी युद्धनौकांच्या निर्मितीकडे वळणार आहे.
पहलगामच्या क्लेषदायी आठवणी
22 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर जेव्हा दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 26 पर्यटकांना ठार मारण्यात आले.
हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बंदूकधाऱ्यांनी काही पर्यटकांना त्यांच्या धर्माविषयी विचारले आणि त्यांनी इस्लामी श्लोकांचे पठण करण्याची मागणी केली. जे यात अयशस्वी झाले किंवा ज्यांनी याला नकार दिला, त्यांच्या डोक्यात गोळ्या मारण्यात आल्या, ज्यामध्ये हिंदू पुरुषवर्गाचा समावेश होता.
टीम भारतशक्ती