सुवर्ण खाणविरोधात तिबेटींचे आंदोलन चिरडण्यासाठी चीनची कठोर कारवाई

0

तिबेटमधील एका गावात सोन्याच्या खाण प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अटकसत्रे आणि दळणवळण बंदीच्या वृत्तांमुळे, तिबेटच्या पठारावर चीनद्वारे केल्या जाणाऱ्या संसाधन उत्खननाच्या पर्यावरणीय आणि राजकीय परिणामांवरची छाननी तीव्र केली आहे. हा प्रदेश अक्षय्य ऊर्जेच्या जागतिक पुरवठा साखळ्यांसाठी अधिकाधिक महत्त्वाचा ठरत आहे.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, नोव्हेंबरच्या सुरुवातीला चिनी अधिकाऱ्यांनी डझनभर तिबेटी नागरिकांना अटक केली. पश्चिम चीनमधील सिचुआन प्रांतातील काशी गावातील रहिवाशांनी, पारंपरिकरित्या भटक्या जमातींकडून मेंढ्या आणि याक चरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुरणभूमीवर सोन्याच्या खाणींना सुरुवातीला विरोध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक पातळीवर ‘सेरकोग’ किंवा ‘सुवर्ण दरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी खाणकाम सुरू झाल्याचे गावकऱ्यांना कळल्यानंतर हे आंदोलन सुरू झाले. ‘जर्नल’ने निर्वासित तिबेटींनी रहिवाशांकडून गोळा केलेल्या आणि धरमशाला येथील तिबेटी निर्वासित सरकारने दुजोरा दिलेल्या माहितीचा हवाला दिला आहे, मात्र, हे दावे आपण स्वतंत्रपणे पडताळून पाहू शकले नाहीत, असेही त्यात नमूद केले आहे.

दिल्लीतील तिबेट पॉलिसी इन्स्टिट्यूटचे उपसंचालक टेंपा ग्याल्टसेन झामल्हा, ज्यांना या भागातील घडामोडींची माहिती आहे, त्यांनी सांगितले की, तिथली परिस्थिती “अत्यंत गंभीर” आहे, विशेषतः पूर्व तिबेटमधील झाचूखा येथे. “चीन सरकारने तिथे सोन्याच्या खाणकामगारांना पाठवले, आणि स्थानिक तिबेटी लोकांनी याला विरोध केला, ज्यामुळे संघर्ष झाला,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, सुमारे ८० तिबेटी लोकांना ताब्यात घेण्यात आले. “नंतर अनेकांना दुखापतींमुळे सोडण्यात आले—यातील काहींच्या बरगड्या मोडल्या होत्या, तर काहींच्या मूत्रपिंडांना इजा झाली होती.”

त्यांनी SratnewsGlobal ला असेही सांगितले की, किमान सात स्थानिक तिबेटी अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र झाल्याचे वृत्त आहे. “वॉल स्ट्रीट जर्नलने आपले वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, चीन सरकारने ही माहिती कोणी लीक केली हे शोधण्यासाठी घरोघरी जाऊन झडतीची मोहीम तीव्र केली,” असे या तज्ज्ञांनी सांगितले. “पाळत वाढली आहे आणि परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक बिकट झाली आहे.”

ही घटना एका व्यापक प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहे. “खाणकाम आणि धरण बांधकामाविरोधात तिबेटमध्ये याआधी अनेक आंदोलने झाली आहेत,” असे टेंपा ग्याल्टसेन झामल्हा यांनी नमूद केले. तिबेटमध्ये लिथियम आणि तांब्याचा मोठा साठा आहे, जे चीनच्या ऊर्जा संक्रमणासाठी अत्यंत महत्त्वाचे स्रोत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “चीनमधील बहुतेक लिथियम आणि तांबे तिबेटमधून येते, परंतु स्थानिक तिबेटी लोकांना याचा काहीही फायदा होत नाही. उलट तिथल्या पर्यावरणाचा होणारा विनाश अत्यंत गंभीर आहे.”

या पठाराच्या नाजूक स्वरूपामुळे खाणकाम हा वादग्रस्त विषय ठरला आहे. “तिबेटचे पठार हे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आणि उंच पठारांपैकी एक आहे,” असे तज्ज्ञांनी सांगितले. “त्याच्या पर्यावरणाला झालेल्या कोणत्याही नुकसानीचे परिणाम भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अगदी चीनवरही होतील. हा एक अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे.”

‘हरित’ खनिजांची जागतिक मागणी वाढत असताना, काशीमधील घटना त्या पुरवठा साखळ्यांच्या उगमाजवळ राहणाऱ्या समुदायांना सोसाव्या लागणाऱ्या मानवी आणि पर्यावरणीय किमतीवर प्रकाश टाकतात.

अनुकृती 

+ posts
Previous articleगाझामधील सैनिकांच्या मुद्द्यावरून असीम मुनीरवर अमेरिकेचा दबाव
Next articleमोदींचा ओमान दौरा: सर्वसमावेशक संबंधांसाठी पाया रचला गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here