भारतीय सशस्त्र दलांनी आज पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत नऊ ठिकाणी हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे उलटून गेल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. पहलगाम घ्या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सकाळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “थोड्या वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले नियोजित आणि निर्देशित केले गेले होते.”
“आमच्या कृती केंद्रित, मोजून मापून आणि सौम्य स्वरूपाच्या आहेत. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे,” असे त्यात म्हटले आहे.
“हे पाऊल पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये २५ भारतीय पर्यटक आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा केली जाईल या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत,” असे त्यात म्हटले आहे.
भारतीय लष्कराच्या अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालकांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूर नावाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर लिहिले आहे: “#पहलगामटेररॲटॅक. न्याय मिळाला. जय हिंद!”
Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) मुझफ्फराबाद येथून वृत्त देताना, रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे की या भागात स्फोटांचे अनेक आवाज ऐकू आले. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने एआरवाय ब्रॉडकास्टरला सांगितले की भारताने तीन ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अर्थात पाकिस्तान त्यांना प्रत्युत्तर देईल.
द न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मुझफ्फराबादच्या रहिवाशांनी आकाशातून जेट विमानांचे आवाज ऐकले. त्यांच्या मते, मुझफ्फराबादजवळील एक ग्रामीण भाग – जो एकेकाळी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने वापरला होता – या हल्ल्यांमध्ये लक्ष्य असल्याचे दिसून आले.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे की आणखी दोन ठिकाणी हल्ला करण्यात आला – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर, जिथे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित धार्मिक मदरसा असल्याचे म्हटले जाते आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून दावा केला की भारतीय हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीत राहून मुरीदके आणि बहावलपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे तसेच पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील कोटली आणि मुझफ्फराबादमधील नियंत्रण रेषेपलीकडे स्टँडऑफ शस्त्रांचा वापर करून हल्ले केले. आपल्या बाजूने झालेल्या जीवितहानीसाठी भारतावर आरोप करत, निवेदनात म्हटले आहे की “पाकिस्तानला त्याच्या आवडीच्या वेळी आणि ठिकाणी योग्य प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरचे निरीक्षण केले, तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना माहिती दिली, असे वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
India has launched #OperationSindoor, a precise and restrained response to the barbaric #PahalgamTerrorAttack that claimed 26 lives, including one Nepali citizen. Focused strikes were carried out on nine #terrorist infrastructure sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and…
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 6, 2025
टीम भारतशक्ती